शबनम न्यूज | प्रतिनिधी
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत, ही जनतेची स्पष्ट इच्छा आहे आणि त्यानुसार लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे संकेत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी दिले. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना, खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी आणि त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे, अशी भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित राहून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अंत्यसंस्कारानंतर माध्यमांशी संवाद साधताना नरहरी झिरवाळ आणि नवाब मलिक यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. झिरवाळ म्हणाले, “जनतेच्या भावना लक्षात घेता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे गरजेचे आहे. योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल.”
याच विषयावर बोलताना नवाब मलिक यांनी सांगितले, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सध्या निश्चित माहिती नाही. मात्र, ही जनतेची इच्छा आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय होईल.”
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या भविष्यातील नेतृत्व आणि पक्षाची एकजूट याबाबत चर्चा वेग घेऊ लागली असून, येत्या काळात महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


