शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांनी घरचा माणूस गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. १९९२ पासून दादांच्या सानिध्यात असल्याचे सांगत, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दादांच्या कार्यशैलीबद्दल आठवणी जागवल्या.
“आम्ही प्रश्न मांडायचे आणि दादा ते सोडवायचे, हे आमच्यातील गणित ठरलेले होते. संबंधित अधिकाऱ्यांच्या थेट बैठका लावून जागेवर प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असायचे,” असे बेलसरे यांनी सांगितले.
अजित पवार यांनी उद्योगधंद्यांना बळकटी देण्यासाठी मोठे योगदान दिले, असे नमूद करत बेलसरे म्हणाले की, दादांच्या जाण्याने उद्योजक पोरके झाले असून उद्योगविश्वासाठी झटणारा आधारवड हरपला आहे.
कुदळवाडीच्या प्रश्नावर नुकतीच दादांची भेट घेतल्याचे सांगताना बेलसरे भावूक झाले. “समित्यांची निवडणूक संपल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढू, असे दादांनी आश्वासन दिले होते. मात्र दुर्दैवाने तीच भेट आमची शेवटची ठरली,” असे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनाने केवळ राजकीय नेतृत्वच नाही, तर उद्योग, व्यवसाय आणि उद्योजकांसाठी कायम उभा राहणारा विश्वासू नेता हरपला आहे, अशी भावना उद्योजक वर्गातून व्यक्त होत आहे.


