शबनम न्यूज | प्रतिनिधी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग, त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रेरणादायी आहे,त्यांचे विचार हे कर्तव्यभावना, धैर्य आणि देशसेवेची जाणीव निर्माण करणारे असून ते समाजासाठी दिशादर्शक आहेत तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक जाणीव, स्पष्ट विचार आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य केले, त्यांच्या कार्यातून समाजातील विविध घटकांना आत्मसन्मान आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


