spot_img
spot_img
spot_img

गुन्हेगारांना अभय आणि देशाच्या सेवकांना तुरुंग ? – प्रशांत जगताप

निलेश घायवळचे लंडनला पलायन, सोनम वांगचुक यांना तुरुंगवास : राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

एकीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री खंडणी, दरोडा, अपहरण, खून, गोळीबार असे गंभीर गुन्हे करणाऱ्या निलेश घायवळ सारख्या गुन्हेगारांना लंडनला पळवून लावण्यासाठी कार्यरत आहेत, तर दुसरीकडे देशाचे गृहमंत्री सत्तेच्या बळावर सोनम वांगचुक यांच्यासारख्या समर्पित देशभक्त व मॅगसेसे पुरस्काराने देशाचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तिमत्त्वास राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारख्या कठोर कायद्यांतर्गत तुरुंगात डांबत आहेत. या अराजकतेच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

सोनम वांगचुक हे देशाच्या सीमेवरील लडाख येथे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करतात. आपल्या या कार्यातून मॅगसेसे पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून त्यांनी भारत देशाचे नाव उज्वल केले आहे. आपल्या ज्ञानाने बर्फाळ प्रदेशातील सैनिकांना उपयोगी ठरतील असे अत्याधुनिक पद्धतीचे तंबू तयार करून त्यांनी भारतीय सैन्याची फार मोठी मदत केली आहे. संशोधन क्षेत्रातील त्यांचे कार्य संपूर्ण विश्वात नावाजले गेले आहे. असे असताना गेल्या काही काळापासून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या देशद्रोही कृत्यांची पोलखोल करण्यास सुरुवात केली. लडाखची हजारो एकर जमीन चीनने गिळंकृत केल्याची बाब त्यांनी समोर आणली. याचा राग म्हणून मोदी सरकारने त्यांना जोधपुर येथे तुरुंगात डांबले आहे. दुसरीकडे पुण्यातील अट्टल गुन्हेगार निलेश घायवळ हा बनावट पत्ता व बनावट पासपोर्ट तयार करून लंडनला पळून गेला आहे. पुण्यातील अनेकांचे आयुष्य उध्वस्त करून हा गुन्हेगार सरकारच्या मदतीमुळेच लंडनला सुरक्षितपणे निघून गेला. बनावट पत्त्यावर पासपोर्ट तयार करणे, लंडन सारख्या ठिकाणी व्हिसा मिळणे या बाबी सरकारी मदतीशिवाय अशक्य आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची चौकशी करावी व नेहमीप्रमाणे कोणालाही अभय न देता गुन्हेगारांना कडक शासन करावे, मोदी सरकारने सोनम वांगचुक यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.

देशात व महाराष्ट्रात सुरू असलेली ही अराजकता भारतासारख्या महान लोकशाही देशासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. या अराजकतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे माझ्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त केला. वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता भयभीत असताना देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना अभय देत आहेत, त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात उदय महाले, अनिता पवार,रमीझ सय्यद, किशोर कांबळे, हेमंत बधे, शैलेंद्र बेल्हेकर, प्रसाद कोद्रे, पप्पू घोलप, आसिफ शेख, डॉ.शशिकांत कदम, युसूफ शेख, रुपाली शेलार, नरेंश पगडालु, गणेश नलावडे आणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!