शबनम न्यूज | प्रतिनिधी
धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झाला. एका समाजातील व्यक्तींनी दुसऱ्या समाजातील धर्मगुरूंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढल्यावरून दगडफेकीचा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, ज्या रांगोळीवरून या वादाला तोंड फुटलं, ती रांगोळी काढणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
अहिल्यानगर शहरातील कोटला परिसरात एका समाजातील गटाकडून धर्मगुरूबद्दल रांगोळी काढणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून उठण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतर तणाव वाढला आणि जमावाने दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.
शेख अल्तमश सलीम जरीवाला या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीमध्ये म्हटले होते की, वाडिया पार्क बारातोटी कारंजा येथे रस्त्यावर रांगोळी काढलेली होती. त्यात धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने नाव लिहिलेले होते. आरती रासकर, संग्राम रासकर (बारातोटी कारंजा) यांनी ही रांगोळी काढली होती, असेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी आंदोलन करताना दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या ३० ते ३५ जणांनाही ताब्यात घेतले आहे.