शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील आज बहुतांश भागात शाळांना सुटी देण्यात आली आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील यंत्रणा मध्यरात्री पासूनच कार्यान्वित झाली आहे.
सोलापूर रस्ता, लोणी काळभोर , कदम वाक वस्ती येथे मुसळधार पावसाने घरे, वाहने पाण्याखाली गेली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. इंदापूर, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. थेऊरमध्ये ५० घरांमध्ये पाणी शिरले असून घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम सुरु आहे.पुणे शहरातील धायरी भागात देखील पाणी शिरल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्याचे निवारण करून नागरिकांना मदत करण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी पाठविण्यात आल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.