शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेली काही विधानं गेल्या काही दिवसांमध्ये वादग्रस्त ठरली होती. या विधानाचा संदर्भ देत नाना पटोलेंनी विधानसभेत संताप व्यक्त केला. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल सभागृहात माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्यावेळी गोंधळ सुरू झाला.
“बबनराव लोणीकर व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान करत आहेत. हा अपमान अन्नदाता सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही”, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, यावर असंसदीय शब्दांचा उल्लेख केल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंना समज दिली. पण तेव्हाच नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन तावातावाने बोलू लागले. यानंतर ५ मिनिटांसाठी सभागृह स्थगित करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी “माफी मागा, माफी मागा, शेतकऱ्यांची माफी मागा”, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.