spot_img
spot_img
spot_img

बांधकाम पूर्ण झाल्यानंतरची कारवाई सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक – खासदार श्रीरंग बारणे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे होत असताना प्रशासनाकडून डोळेझाक केली जाते. दोन मजल्यापर्यंत बांधकामे होईपर्यंत त्याकडे कानाडोळा केला जातो. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कारवाई केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होतो. त्यामुळे प्रशासनाने अनधिकृत बांधकाम होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांना केली. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर केलेल्या कारवाईमुळे प्रशासनाचे पैसे आणि वेळही वाया जातो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

खासदार बारणे म्हणाले, आयुक्तांनी प्रशासनावर नियंत्रण ठेवावे. त्यांच्या तालावर वागू नये, शहराबाबतचे वादग्रस्त विधान आणि बोगस उपसूचनांद्वारे ठेकेदारांना दिलेली ५२ कोटी रुपयांची बिले यावरील नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी कारवाईची मोहिम हाती घेतल्याचे दिसते. बांधकाम परवानगीसाठी अनेक टेबल वाढवून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. एक प्रकारे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी वसुलीच करत आहेत. ‘वन विंडो’ परवानगी मिळावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. तसेच महापालिकेचे मैला मिश्रित पाणी थेट नदीपात्रात जाते, याबाबत कार्यवाही करावी. महापालिका क्षेत्रातील उद्यानांची झालेली दुरवस्था याबाबत ठोस निर्णय घ्यावा. महापालिकेच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे आणि बांधकाम सुरू होण्यापूर्वीच त्याची दखल घ्यावी. तसेच महापालिका क्षेत्रातील स्वच्छता व सुरक्षा, सध्या बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे चालू करण्यात लक्ष द्यावे.

स्मार्ट सिटी योजनेत झालेल्या कामाच्या दर्जाबाबत चौकशी करावी आणि सद्यस्थितीत चालू असलेल्या कामाबाबत गांभीर्याने लक्ष घालावे, याबाबत मी सातत्याने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या महत्वाच्या कोणत्याही कामाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये बांधकाम सुरू होण्यापूर्वीच लक्ष घातले नाही, ही चुकी कोणाची याचाही शोध लावावा. महत्वाच्या प्रश्नांकडील लक्ष हटवण्यासाठी कदाचित अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेतली असेल. हा गरीब नागरिकांवर होत असलेला अन्यायकारक प्रकार आहे. अतिक्रमण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावरती गांभीर्याने लक्ष घातले नाही. त्याचा परिणाम गोरगरीब माणसाला भोगावा लागत आहे. स्वच्छ पाणी तसेच महापालिका क्षेत्रामध्ये प्रचंड होत असलेले प्रदूषण, नदी प्रदूषण व पावसाळ्यापूर्वी नालेसफाई याच्यावरती गांभीर्याने लक्ष घालून ते पूर्ण करण्यात लक्ष केंद्रित करावे. एकाच जागेवर अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी आयुक्तांना केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!