spot_img
spot_img
spot_img

भामा आसखेड धरण पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम तात्काळ पुर्ण करा – महापौर रवि लांडगे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना शुध्द,मुबलक व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजना प्रकल्पाची आज महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी बोलत होते.

या पाहणीदरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, कुणाल वाव्हळकर, शेखर चिंचवडे,नवनाथ जगताप यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अनिल भालसाखळे, महेश कावळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महापौर यांनी प्रकल्पातील विविध कामांचा आढावा घेतला. मौजे वाकी तर्फे वाडा येथे उभारण्यात येत असलेल्या अशुद्ध जल उपसा केंद्राच्या कामाची त्यांनी पाहणी करून तेथून दररोज १६७ दशलक्ष लिटर पाणी कशा प्रकारे शहरासाठी उपलब्ध होणार आहे याची माहिती घेतली. तसेच या उपसा केंद्रापासून तळेगाव येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत टाकण्यात येणाऱ्या ७.३० किलोमीटर लांबीच्या १७०० मि.मी. व्यासाच्या रायझिंग मेन जलवाहिनीच्या कामाच्या प्रगतीचाही आढावा घेतला.

तसेच नऊलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकच्या उभारणीसंदर्भात आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती घेत महापौरांनी लवकरात लवकर प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात येणाऱ्या १८.८० किलोमीटर लांबीच्या १४०० मि.मी. व्यासाच्या ग्रॅव्हिटी मेन जलवाहिनीच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची माहिती घेताना महापौरांनी हायड्रॉलिक, जीआय आणि स्ट्रक्चरल डिझाईनबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

महापौर रवि लांडगे यावेळी म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पामुळे शहरातील अनेक भागांतील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. त्यामुळे प्रकल्पातील सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करून शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी शहरातील पाणीपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यातील पाणी गरजांची पूर्तता करण्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारल्या जात असल्याचे नमूद केले, आयुक्तांनी प्रकल्पातील विविध घटकांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि तांत्रिक बाबींची त्यांनी सविस्तर माहिती घेतली तसेच भामा आसखेड प्रकल्प हा शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी निर्णायक ठरणार असून, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. महापौर यांनी दिलेल्या सूचनांनुसार सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. शिवाय, नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असेही ते यावेळी म्हणाले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!