शबनम न्यूज | प्रतिनिधी
लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेसच्या वतीने काळेवाडी येथे शुक्रवारी (दि. १०) “वोट चोर स्वाक्षरी मोहीम अभियान” राबविण्यात आले. अभियानाला अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर महिला अध्यक्षा सायली नढे यांनी सुरुवात केली.
या अभियानात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनोज कांबळे, माजी नगरसेविका निगा बारस्कर, माजी नगरसेवक अभिमन्यू दहीतुले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, तसेच अजय खराडे, स्वाती शिंदे, आशा भोसले, प्रज्ञा जगताप, प्रियंका सगट, शबाना शेख, रोहित शेळके, जय ठोंबरे, शोएब कुरेशी आणि विलास सगट यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
” या अभियानाचा मुख्य उद्देश निवडणूक काळात होणाऱ्या मत चोरीच्या प्रकरणांविरुद्ध जनजागृती करणे, मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गैरप्रकारांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे हा आहे.” असे सायली किरण नढे यांनी म्हटले आहे.
काळेवाडी परिसरात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करून लोकशाहीला बळकटी देण्यासाठी ही मोहीम एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. असेही नढे यांनी सांगितले.