शबनम न्यूज :प्रतिनिधी
टाकवे- मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुनील आण्णा शेळके यांनी हाती घेतलेल्या “जनसंवाद” अभियानाचा पुढचा टप्पा टाकवे बु. ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टाकवे बु., फळणे, बेलज, राजपुरी व भोयरे पाथरगाव या गावांमध्ये पार पडला.
या कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी व मागण्या आमदारांसमोर स्पष्टपणे मांडल्या. पाणीपुरवठ्याची अडचण, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था, वीज समस्यांबाबत तक्रारी, रेशनकार्डच्या गैरसोयी, एस.टी. बसची अनियमितता, पाणंद रस्ते खुले करण्याची मागणी यावर ग्रामस्थांनी भर दिला. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत प्रस्ताव सादर करणे या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
कार्यक्रमात महसूल, पंचायत समिती, विद्युत वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, वनविभाग आदींचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सर्व तक्रारींची सखोल नोंद घेऊन संबंधित विभागांशी तातडीने चर्चा करून त्वरित कार्यवाही केली जाईल, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी ग्रामस्थांना दिला.
यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले –
“जनसंवाद हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून तो लोकांच्या भावना समजून घेण्याचा, त्यांच्या अडचणींना गांभीर्याने ऐकून त्यावर तोडगा काढण्याचा एक खरा प्रयत्न आहे. तळेगाव, वडगाव येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिक नियमितपणे भेट देतात, परंतु ज्या नागरिकांना तिथे पोहोचणे शक्य नाही अशा माता-माऊली व बांधवांच्या अडचणी मी त्यांच्या गावी जाऊन ऐकणार आहे. पुढील काही दिवसांत तालुक्यातील सर्व गावांमध्ये जाऊन थेट जनतेशी संवाद साधून विकासासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील.”
मावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणून सुनील शेळके यांचे हे अभियान ही केवळ एक राजकीय उपक्रम नसून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा आणि विकासाच्या वाटचालीला गती देण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.