शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यभरात दर शनिवारी रविवारी तसेच इतर दिवशी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा आणि कलावंतांचा भरभरून प्रतिसाद असतो. ही परंपरा आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, अचानक शासकीय कामकाज किंवा राजकीय कार्यक्रम जाहीर झाल्यास, अनेक वेळा याच दिवशी आयोजित नाट्यशो वा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले जातात. यामुळे संबंधित कलाकारांचे आर्थिक नुकसान होते, तसेच प्रेक्षकवर्गही नाराज होतो. कलावंत या कार्यक्रमांच्या माध्यमातूनच आपला उदरनिर्वाह करतात, त्यामुळे कार्यक्रम रद्द होणे ही बाब गंभीर आहे. यासंदर्भात आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणी करत शासनाने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी केली.
या मुद्द्यावर राज्यभरातील अनेक कलावंतांनी आमदार गोरखे यांचे आभार मानले असून, त्यांनी यावेळी काही महत्त्वाच्या मागण्या देखील मांडल्या. या मागण्यांमध्ये:
‘राजर्षी शाहू महाराज सन्मान योजना’ अंतर्गत लाभार्थी कलाकारांची संख्या १०० वरून ५०० करण्याची मागणी केली तसेच म्हाडाच्या घरांमध्ये कलाकारांसाठी असलेला २% कोटा वाढवून १०% करण्याची विनंती देखील यावेळी करण्यात आली.
या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन योग्य तो निर्णय काढण्याचे आश्वासन आमदार अमित गोरखे यांनी दिले. कलाकारांचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडल्याबद्दल राज्यभरातील साहित्यिक, रंगकर्मी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी आमदार अमित गोरखे यांचे आभार मानले आहेत व त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.