spot_img
spot_img
spot_img

सैनिकांसाठी कार्यरत सौ. सुमेधाताई चिथडे यांना यंदाचा ‘सावित्री’ पुरस्कार जाहीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सावित्री फोरमतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘सावित्री’ पुरस्कार यंदा सियाचिन आणि कुपवाडा येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग युनिट उभारणाऱ्या व सैनिकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सौ. सुमेधाताई चिथडे यांना जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता पुण्यातील जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड येथे हा पुरस्कार समारंभ संपन्न होईल. राष्ट्रीय सर्वोत्तम शिक्षक पुरस्काराचे मानकरी श्री विद्या विकास, सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि नामवंत शैक्षणिक सल्लागार श्रीकांत गणपती सुतार याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमात सावित्री फोरमतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विद्यानिधी योजना’ अंतर्गत हुशार आणि गरजू विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य देण्याचा उपक्रम संपन्न होईल. यंदा ५० विद्यार्थिनींना एकूण सुमारे 1 लाख रुपयांची शैक्षणिक मदत देण्यात येणार आहे.

सौ. सुमेधाताई चिथडे या SIRF (Soldiers Independent Rehabilitation Foundation) या संस्थेच्या संस्थापिका असून त्यांचे संपूर्ण कार्य हे भारतीय सैनिकांसाठी समर्पित आहे. त्यांनी स्वतःच्या स्त्रीधनातून आणि लोकसहभागातून सियाचिनसारख्या प्रतिकूल हवामानातील रणभूमीवर लढणाऱ्या जवानांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग युनिट उभारले. त्यांच्या या राष्ट्रसेवेचा लाभ आजवर ३५,००० हून अधिक जवानांनी घेतला असून, त्याच्या दुसऱ्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे उभारलेल्या युनिटमधून ६५,००० पेक्षा अधिक लाभार्थी सैनिकांना मदत पोहोचली आहे.

त्यांनी शहीदांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणे, अपंग सैनिकांच्या गरजा पूर्ण करणे, सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वाहने आणि सुविधांची उभारणी करणे, सैनिकी रुग्णालयासाठी सोलर प्लांट उभारणे अशा विविध उपक्रमांतून राष्ट्रसेवेला वाहिलेले जीवन जगले आहे.

सौ. सुमेधाताई या केवळ राष्ट्रभक्त कार्यकर्त्या नाहीत, तर त्या उत्तम गायिका, लेखिका आणि कवयित्रीसुद्धा आहेत. त्यांना आकाशवाणी, दूरदर्शन आणि नाट्य स्पर्धांमधून अनेक गौरव प्राप्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवन आदर्श मानत त्यांनी आपल्या विचारसरणीच्या धाग्यांमध्ये राष्ट्रप्रेम पेरले आहे. एक वीरपत्नी आणि वीरमाता म्हणून त्यांनी केवळ कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी आणि राष्ट्रासाठी जे कार्य केले आहे, त्याचा गौरव सावित्री पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. असे सचिव संयोगिता कुदळे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!