पिंपरी-चिंचवड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शहरात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम पार पडले. खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महाराजांना अत्यंत आदर आणि भक्तीभावाने अभिवादन करण्यात आले.
शुक्रवार, दि. ०३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना योगेश बहल यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, “शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी राजा नव्हते, तर ते एक प्रेरणादायी विचार होते. त्यांच्या जीवनातून आपल्याला नैतिकता, पराक्रम, प्रजाभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा यांचे अमूल्य धडे मिळतात. भ्रष्टाचारमुक्त समाज, महिलांचा सन्मान आणि एकसंध राष्ट्रनिर्मिती हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
तसेच ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी आपल्या भाषणात शिवरायांच्या प्रशासन कौशल्यावर प्रकाश टाकत सांगितले की, “अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शिस्तबद्ध आणि पारदर्शक राज्यकारभार उभारला. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी जिद्द आणि योग्य हेतूने त्याचा पराभव करता येतो, हा आत्मविश्वास त्यांनी मराठी माणसात निर्माण केला. स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे रक्षण आणि सर्वधर्मसमभाव ही त्यांच्या स्वराज्याची वैशिष्ट्ये होती.”
या कार्यक्रमास शहरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये कार्याध्यक्ष फजल शेख, शाम लांडे, विजय लोखंडे, राजेंद्र जगताप, मायला खत्री, बन्सी पारडे, जितेंद्र ननावरे, प्रतिक्षा लांघी-जवळकर, श्रीकांत कदम, बाळासाहेब पिल्लेवार, अभिजीत आल्हाट, अकबर मुल्ला, गोरोबा गुजर, निलम कदम, गणेश गायकवाड, ज्ञानेश्वर कांबळे, प्रशांत महाजन, सुरविंद्रसिंग बाला, सचिन गायकवाड, अभिजीत आपटे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे आदींचा समावेश होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त व्यक्त झालेल्या या भावना आणि त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार, उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.



