spot_img
spot_img
spot_img

जीवनदीप आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू हा प्रशासकीय निष्काळजीपणाचा बळी

दोषींवर गुन्हे दाखल करून प्रशासक नियुक्त करा – आमदार अमित गोरखे यांची सभागृहात मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जीवनदीप अनुदानित आश्रम शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या कुमारी दिपाली विलास कोमटी या विद्यार्थिनीचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि संवेदनाहीनता यामुळेच एका निष्पाप मुलीला प्राण गमवावे लागले असून, या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आमदार अमित गोरखे यांनी आज सभागृहात केली.

नेमकी घटना काय?
या गंभीर घटनेकडे सरकारचे लक्ष वेधताना आमदार गोरखे यांनी शाळा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिपाली आजारी असताना शाळा प्रशासनाने तिच्या पालकांना वेळेवर कोणतीही माहिती दिली नाही. उलट, अत्यंत उशिरा इतर विद्यार्थ्यांमार्फत पालकांना निरोप धाडण्यात आला. जेव्हा तिची आई शाळेत पोहोचली, तेव्हा मुलीची प्रकृती चिंताजनक होती. शाळेने उपचार तर दूरच, पण साधी माणुसकीही दाखवली नाही. अखेर आईने स्वतः धावपळ करून तिला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आमदार अमित गोरखे यांची भूमिका

दिपालीच्या आजारपणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याध्यापकांवर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे. या आश्रम शाळेचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे या संस्थेवर शासनाने तातडीने ‘प्रशासक’ नियुक्त करावा. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून पीडित कोमटी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्वासाने आपली मुले प्रशासनाच्या स्वाधीन केलेली असतात. जर प्रशासन इतके बेजबाबदार असेल, तर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. सरकार हे खपवून घेणार नाही. दोषींना शिक्षा मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा इशारा आमदार अमित गोरखे यांनी यावेळी दिला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!