शबनम न्यूज | प्रतिनिधी
सासवडजवळील ऑस्करवाडी तलाव परिसरात मुस्लिम बांधवांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींना अद्याप अटक न झाल्याने समाजवादी पक्षाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “पुणे ग्रामीण पोलिसांच चाललंय काय?” असा सवाल करत पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर यांनी प्रशासनावर टीका केली.
या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटूनही आरोपींना अटक न झाल्याच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच या घटनेत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
या आंदोलनात पुणे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर, प्रदेश सरचिटणीस अनिस अहमद, शहर सरचिटणीस दत्ता पाकिरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनायक लांबे, अशोकराव गायकवाड, शहर संघटक प्रकाश डोंबाळे, जावेद शेख, अझिम शेख, भारत मालुसरे, शमिम पठाण, सलिम शेख, राहुल ससाणे, अजित जाधव, जय काटे, नइम शेख, दस्तगीर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोगदेव घाटात घडलेल्या महिला अत्याचार प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली होती. मात्र या प्रकरणात अद्याप कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. “या घटनेत सरकारचा दबाव आहे का?” अशी शंका प्रदेश सरचिटणीस अनिस अहमद यांनी व्यक्त केली.
या प्रकरणी तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समाजवादी पक्षाने दिला आहे.



