spot_img
spot_img
spot_img

ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सव २०२५चा उत्साहात प्रारंभ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
दोन दिवसीय ग्रंथोत्सव २०२५चा प्रारंभ शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भैरवनाथ चौक, पिंपरी वाघेरे येथील छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक ते पिंपरी काॅलनी येथील आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय या महोत्सव स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने करण्यात आला. नगरसेविका प्रियांका कुदळे, नगरसेविका निकिता यादव, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, आर्य समाजच्या नलिनी देशपांडे, पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे पूजन, ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली. त्यामध्ये विद्यानिकेतन, आर्य विद्यामंदिर, आर्य वाणिज्य महाविद्यालय, बीटी मेमोरियल माध्यमिक विद्यालय, जयहिंद विद्यालय, इंदिरा गांधी विद्यालय आणि सिक्कीबाई धर्माणी विद्यालय या विविध विद्यालयातील सुमारे तीनशे विद्यार्थी शालेय गणवेष तसेच पारंपरिक वेषभूषा परिधान करून ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते; तसेच शिक्षकवृंद आणि पुणे जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांचे ग्रंथपाल यांनीदेखील आवर्जून सहभाग घेतला होता. ढोलताशा पथक, विद्यार्थिनींचे लेजीम पथक ग्रंथांचे माहात्म्य अन् वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारे फलक हातात घेऊन विद्यार्थी ‘जय भवानी – जय शिवाजी’ यांसह प्रेरणादायी घोषणा देत होते.

ग्रंथोत्सव २०२५ मध्ये उद्घाटन सत्रानंतर डाॅ. अनुजा कुलकर्णी यांनी ‘लोकमाता ते राजमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ या विषयावरील व्याख्यानातून, ‘प्रजेवर पुत्रवत प्रेम हेच अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे बलस्थान होते!’ असे प्रतिपादन केले. चौंडीची मुलगी ते राजमाता ते लोकमाता ही अहिल्यादेवींची प्रेरणादायी वाटचाल डाॅ. अनुजा कुलकर्णी यांनी विविध संदर्भ उद्धृत करून मांडली.

‘गझल : वाटचाल उर्दूतून मराठीकडे’ या विषयावर ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांनी माधव ज्युलियन यांनी उर्दूतून मराठीत आणलेल्या आणि गझलसम्राट सुरेश भट यांनी खऱ्या अर्थाने मराठीत रुजवलेल्या गझलेची वाटचाल वैविध्यपूर्ण गझलांचे प्रभावी सादरीकरण करीत उलगडून सांगितली. ‘पालखी’ या स्वरचित गझलेने त्यांनी गझलेचा संतसाहित्याशी असलेला अनुबंध अधोरेखित केला; तर ‘माझी मुलगी’ या स्वरचित गझलेच्या उत्कट सादरीकरणातून उपस्थितांना सद्गदित केले.

याप्रसंगी श्रेया गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही मान्यवरांच्या हस्ते पंचवीस वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या ग्रंथपालांना सन्मानित करण्यात आले. पूजा दीक्षित यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!