spot_img
spot_img
spot_img

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व विषारी धुरामुळे आरोग्य धोक्यात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्रात कुठलीही प्रक्रिया न करता अवैधरित्या टाकण्यात येणारा कचरा त्वरित बंद करावा, या मागणीसाठी एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एडीटी) शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली.

या आंदोलनात शैक्षणिक संकुलातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल, एमआयटी ज्युनिअर महाविद्यालय व एमआयटी एडीटी विद्यापीठातील हजारो विद्यार्थी व निवासी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सर्वांनी या विषयाची गंभीरता, भविष्यातील संभाव्य धोके, मुळा-मुठा नदीचे अस्तित्व, परिसरातील पर्यावरणाबाबत स्थानिक ग्रामपंचायतींची उदासीनता तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडून या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तसेच विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला नदीत कुठलीही प्रक्रिया न करता दररोज टाकला जाणारा ३५ ते ४० ट्रॅक्टर कचरा तातडीने थांबविण्याची तसेच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच सदर वाहने आडविण्याची विनंती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनासह स्थानिक पोलिसांनाही याबाबत पत्र दिले.

नुकतीच नदीपात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी भयंकर आग लागली, जी पुढील तब्बल चार दिवस धुमसत राहिली. त्यामुळे परिसरात प्रचंड विषारी धुराचे लोट पाहायला मिळाले. यामुळे २७ फेब्रुवारी रोजी एमआयटी एडीटी शैक्षणिक संकुलातील ६–७ विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊन गुदमरल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागले. या आगीमुळे व धुरामुळे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, स्थायी कर्मचारी व परिसरातील नागरिकांना श्वसनाचा गंभीर त्रास झाला.

नदीपात्रात टाकलेल्या कचऱ्याला लागलेली आग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) एकमेव बंब आणि एमआयटी एडीटी विद्यापीठातील २५–३० कर्मचाऱ्यांनी पाच दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करून मंगळवारी (२ मार्च) विझवली. मात्र लागलेल्या या आगीमुळे चार दिवस परिसरात विषारी धुराचे प्रचंड लोट जमा झाले. यामुळे वसतिगृहातील तसेच परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होणे, घसा बसणे इत्यादी त्रास झाला. तसेच शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना विषारी धुरामुळे शुक्रवारी मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागले होते.

एमआयटी शैक्षणिक संकुलात सध्या राज्यासह देश-विदेशातून आलेले जवळपास २०,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास ५,००० विद्यार्थी व १,००० कर्मचारी शैक्षणिक संकुलाच्या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे, प्रशासनाने लवकरात-लवकर या गंभीर विषयाची दखल घेत, तातडीने नदीपात्रात कचरा टाकणे थांबवावे अशी, आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली.


गेल्या काही वर्षांपासून स्थानिक लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती व इतर काही जवळच्या गावांकडून थेट मुळा-मुठा नदीपात्रात अवैधरित्या व कुठलीही प्रक्रिया न करता रोज तब्बल ३५ ते ४० ट्रॅक्टर कचरा टाकला जातो. नदीपात्रात आता कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. यामुळे केवळ वायुप्रदूषणच नव्हे तर जलप्रदूषणही वाढत असून मुळा-मुठा नदीचे पाणी प्रचंड दूषित होवून जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रातील कचऱ्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण, दुर्गंधी इत्यादींमुळे पुणे शहराची तसेच महाराष्ट्राची प्रतिमाही मलीन होत आहे.

दादासाहेब भोसूरे, विद्यार्थी प्रतिनिधी

पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात थेट कचरा टाकणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नदीपात्रात कचऱ्याचे डोंगर उभे असून त्यास सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे विषारी धुराचे लोट तयार होऊन आम्हा विद्यार्थ्यांना श्वसनाच्या समस्या जाणवत आहेत. जिल्हा प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने हस्तक्षेप करावा. नदीपात्रात अवैधरित्या थेट कचरा टाकणे त्वरित थांबवावे. विद्यार्थी व परिसरातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी.

— मुग्धा सोनवणे, विद्यार्थीनी

मुळा-मुठा नदीच्या सानिध्यात असणारा आमचा एमआयटी एडीटी विद्यापीठाचा परिसर अतिशय निसर्गसंपन्न आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायतींकडून कुठलीही प्रक्रिया न करता टाकण्यात येणाऱ्या या कचऱ्यामुळे नदीचे पाणी अतिशय घाण झाले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. कचऱ्याला सातत्याने लागणाऱ्या आगींमुळे वायू प्रदूषण वाढले असून नुकतेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक तब्बल ३४० इतकी गंभीर नोंदविण्यात आली. या कचऱ्यामुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करावी.

— अनय अहिरे, विद्यार्थी

मुळा-मुठा नदीपात्रात थेट टाकला जाणाऱ्या या कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून गेले चार दिवस श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांनी आज विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या तीव्र मागणीनंतर आम्ही स्थानिक ग्रामपंचायतींच्या विद्यापीठातून जाणाऱ्या गाड्या आजपासून प्रवेशद्वारावरच थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतीत लवकर लक्ष घालून स्थानिक ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी.

– डॉ. महेश चोपडे,
कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!