spot_img
spot_img
spot_img

जनतेच्या तक्रारींची दखल घ्या; फूड जॉईंट्सची प्रत्यक्ष नोंद दाखवा- डॉ. नीलम गोऱ्हे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रस्ता उभारण्यात आलेल्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा होऊनही तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील यांनी लक्षवेधी द्वारे विधान परिषदेत उपस्थित केला होता.“हा पुतळा नेमक्या किती दिवसांत उभारला जाणार?” असा प्रश्न त्यांनी सरकारकडे केला.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी, “पूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी याबाबत बोलू शकेन. सन्माननीय सदस्यांना संपूर्ण माहिती घेऊन कळवू,” असे सांगितले.

या चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, हा विषय केवळ एका सदस्यापुरता मर्यादित नसून जनतेशी निगडित आहे. अधिवेशन सुरू असताना सरकारने आठ दिवसांच्या आत याबाबत सविस्तर लेखी निवेदन सादर करावे, अशी त्यांनी विनंती केली.

तसेच समृद्धी महामार्गावर सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या २२ फूड जॉईंट्सबाबत प्रत्यक्षात सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्या २२ ठिकाणांची सकाळी व संध्याकाळी स्थिती दर्शवणारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पुढील आठवड्यात दाखवावे, अशीही त्यांनी सूचना केली.

“आम्ही आमदारांनी वारंवार सांगण्यापेक्षा प्रशासनानेच प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट करावी. आम्हाला व संबंधित आमदारांना प्रत्यक्ष दाखवा,” असे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या स्वच्छतागृहांच्या सुविधांबाबतही समस्या कायम असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. “मी स्वतः नुकतीच नाशिकला जाऊन आले असून पुन्हा भेट देणार आहे. कागदोपत्री कामे पूर्ण दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी लोकांकडून येत आहेत. सुपरव्हिजनमध्ये काही त्रुटी राहात आहेत का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

समृद्धी महामार्गावरील सुविधा, रेस्टॉरंट्स व सेवा केंद्रांची अचूक माहिती गुगल मॅपवर अद्ययावत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, जेणेकरून प्रवाशांना प्रत्यक्ष सुरू असलेल्या सुविधा सहज उपलब्ध होतील.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!