शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाधववाडी, गल्ली नं. १० येथे पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची घटना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सूरज सुरेंद्र कश्यप (वय २०, व्यवसाय – नोकरी, रा. गल्ली नं. १०, जाधववाडी, चिखली, पुणे) व त्यांचे वडील सुरेंद्र जदूराम कश्यप (वय ४०) हे घरासमोर बसले असताना आरोपी विजय बिंद (वय ११, रा. गल्ली नं. १०, जाधववाडी, चिखली) याने १०० रुपये दिल्याच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली.
वाद वाढल्यानंतर आरोपीने घरगुती वापराच्या चाकूने फिर्यादीच्या मान व पाठीवर वार करून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या फिर्यादीच्या वडिलांवरही आरोपीने चाकूने हल्ला करत त्यांच्या डाव्या गालावर गंभीर दुखापत केली.
या घटनेप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


