शबनम न्यूज | प्रतिनिधी
इयत्ता बारावीची राज्य मंडळाची लेखी बोर्ड परीक्षा उद्या, मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून होत आहे. या परीक्षेसाठी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात एकूण ३५ परीक्षा केंद्रांवर तब्बल ३३ हजार ७३३ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. यासर्व विद्यार्थ्यांना महापौर रवि लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित, शांत आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. त्यानुसार दोन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, बैठे भरारी पथकांचेही योग्य नियोजन करण्यात आले आहे. या पथकांमार्फत परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे, जेणेकरून परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि शिस्त अबाधित राहील.
तसेच, परीक्षा काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह परीक्षेची शिस्त राखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत देखरेख ठेवण्यात येणार आहे. यामुळे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना विश्वासार्ह वातावरणात परीक्षा देता येणार आहे.
दरम्यान, सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे, तसेच कोणतेही प्रतिबंधित साहित्य सोबत आणू नये, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
इयत्ता १२ वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी आहे. सर्व विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका
बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध राहावी, यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक खबरदारी घेतली आहे. भरारी पथके, सीसीटीव्ही देखरेख, तसेच पोलीस बंदोबस्ताच्या माध्यमातून गैरप्रकारांना पूर्णतः आळा घालण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे.
— ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका


