नवी सांगवी, प्रभाग क्र. ३१ : नवी सांगवी परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३१ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गणपत जगताप, अरुण श्रीपती पवार, दिप्ती अंबरनाथ कांबळे, उमा शिवाजी पाडुळे यांनी निवडून आल्यावर नवी सांगवीतील वीजपुरवठा व पाणीपुरवठा कायमस्वरूपी नियमित करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवू, असे आश्वासन दिले.
घरगुती वापर, व्यावसायिक आस्थापना तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर वीजखंडिततेचा मोठा परिणाम होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत. या समस्या केवळ तात्पुरत्या उपायांनी नव्हे, तर नियोजनबद्ध पायाभूत सुधारणा करूनच सुटू शकतात. आम्ही निवडून आल्यावर या समस्या सोडविण्याला प्रथम प्राधान्य देऊ, असे आश्वासन राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
राजेंद्र जगताप म्हणतात…
वीज वितरण कंपनी व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधून नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार आहोत. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हीच खरी लोकसेवा आहे. विकासकामे करण्याला आमचे प्राधान्य आहे.
अरुण पवार म्हणतात….
नवी सांगवी परिसरातील वीज आणि पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली या समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व पॅनल एकजुटीने काम करू. नागरिकांना त्रास होणार नाही, याची आम्ही जबाबदारी घेऊ.
दिप्ती अंबरनाथ कांबळे म्हणतात…
महिलांना सर्वाधिक त्रास पाणीपुरवठ्याच्या अनियमित वेळांमुळे सहन करावा लागतो. पाणी वेळेवर आणि पुरेशा दाबाने मिळावे, यासाठी नियोजनबद्ध काम केले जाईल. माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा अनुभव या कामी नक्कीच उपयोगी ठरेल.
उमा शिवाजी पाडुळे म्हणतात…
नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणारे आणि त्यावर तात्काळ कृती करणारे नेतृत्व आवश्यक आहे. वीज व पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची क्षमता आमच्यात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधील आम्ही सर्वजण नवी सांगवीचा निश्चित विकास करू.


