शबनम न्यूज:प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्तेसाठीची राजकीय संघटना नसून, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि संयम या मूल्यांवर उभी असलेली विचारसरणी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या विचारसरणीचे जिवंत उदाहरण म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता श्री. रवि दादा भिलारे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या निष्ठावान व प्रामाणिक कार्याची विशेष दखल घेतली असून, त्यांच्या संयमी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवि दादा भिलारे हे इच्छुक उमेदवार होते. मात्र, पक्षाने अधिकृत उमेदवारी न दिल्यानंतरही त्यांनी कोणतीही नाराजी न दाखवता, पक्षहितालाच सर्वोच्च मानले. अनेकदा अशा परिस्थितीत कार्यकर्ते पक्षापासून दूर जातात किंवा विरोधी भूमिका घेतात, मात्र रवि दादा भिलारे यांनी याला अपवाद ठरवत, भारतीय जनता पार्टीशी तसेच जगताप कुटुंबाशी असलेली आपली निष्ठा कृतीतून सिद्ध करून दाखवली.
पक्षाचा आदेश म्हणजे अंतिम आदेश, या भावनेतून त्यांनी उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. बूथ पातळीवर कार्य करणे, मतदारांशी संवाद साधणे, प्रचार रॅली, बैठकांमध्ये उपस्थिती लावणे अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या. उमेदवारी न मिळाल्याची खंत बाजूला ठेवून त्यांनी दाखवलेला संयम आणि पक्षनिष्ठा ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या निष्ठावान भूमिकेची दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी स्वतः रवि दादा भिलारे यांचे विशेष अभिनंदन केले. “अशा निष्ठावान कार्यकर्त्यांवरच पक्षाची खरी ताकद उभी असते,” असे गौरवोद्गार काढत त्यांनी रवि दादांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत, भविष्यात अधिक मोठी जबाबदारी मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
रवि दादा भिलारे यांची ही दखल म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, संपूर्ण सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. पक्षात पद किंवा उमेदवारीपेक्षा निष्ठा आणि कार्य महत्त्वाचे असते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
आजच्या राजकारणात जिथे संधीसाधूपणा वाढताना दिसतो, तिथे रवि दादा भिलारे यांची भूमिका ही निष्ठा, संयम आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. त्यामुळेच त्यांची ही दखल अनेक तरुण व नव्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत असून, “कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा आधारस्तंभ आहे” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


