शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण म्हणजे तनिषा भिसे यांची हत्या आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. तसंच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाला आहे. सत्ताधाऱ्यांचे हाल होत असतील तर सामान्य माणसांचं काय? मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन गेल्यावरही मदत मिळत नसेल तर कुणाला न्याय मागायचा? या सरकारने याबाबत आत्मचिंतन केलं पाहिजे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे. माणुसकी आहे की नाही? अत्यंत दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी ही घटना आहे. आमची सरकारकडून अपेक्षा आहे की आता अहवाल आला आहे आणि रुग्णालयाची चूक आहे हे दिसतं. तनिषा भिसेंची हत्या झाली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता काय दहा समित्यांचा अहवाल येईपर्यंत वाट बघणार का? असाही सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.
या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. भिसेंच्या दोन मुली आयसीयूत आहेत. देव त्यांना अडचणीच्या काळात ताकद देओत. मी भिसे कुटुंबासाठी भेट घेतली. त्यांच्या घरातली त्यांच्या घरातली बायको, मुलगी, सून असलेल्या तनिषा भिसेंवर अन्याय झाला आहे त्यांची हत्या झाली आहे. आता त्यांची लेक, सून यांना तर आम्ही परत आणू शकत नाही. भिसे कुटुंबाला मदतीसाठी, आधार देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. त्या मुलीची तनिषाची हत्या झाली आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीवर ही वेळ येऊ नये अशी आता आमची अपेक्षा आहे. तसंच त्या दिवशी नेमकं काय झालं? हे समजलं पाहिजे. तसंच महाराष्ट्रातल्या रुग्णालयांसाठी सरकारने एक नियमावली जाहीर करावी अशीही आमची मागणी आहे.