उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला विश्वास..
शबनम न्यूज | प्रतिनिधी
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास राज्यसरकारने घेतलेला पुढाकार हा समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारा ठरेल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ वर्षाकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे.मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयावर बोलतांना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, छत्रपती संभाजी नगर नागसेन वन येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पीईएस अभियांत्रिकी मिलिंद महाविद्यालयाला १ ऑगस्ट २०२५ ला मी भेट दिली होती.मिलिंद महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५० मध्ये औरंगाबाद येथे सुरू केलेले एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. त्याची इमारत बौद्ध स्थापत्यशास्त्राच्या तत्त्वांनुसार बांधलेली आहे. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जिर्णोध्दार, जतन तसेच नागसेनवन परिसरात ध्यान साधना केंद्राची उभारणी, व इतर समस्यां सोडविण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचा यावेळी विश्वास दिला होता.
त्यांनतर मा. मुख्यमंत्री यांना पत्र पाठवत पीईएस सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, पीईएस संस्था, नागसेनवन परिसरात ध्यान साधना केंद्राची उभारणी करीता शासन अट शिथील करुन एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी, ही विनंती केली होती.
राज्य सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी केलेली ही व्यापक योजना आहे.मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. या माध्यमातून बाबासाहेबांनी उभारलेल्या संस्थांचे आधुनिकीकरण, संरचनात्मक सुधारणा आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले.